अतिवृष्टीची मदत खात्यात जमा: राज्यातील पूर आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील मदत वाटप सुरू; मात्र खात्यात २ ते ५ हजारांची तुटपुंजी रक्कम जमा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी.
मुंबई:
राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यातील मदत वितरणाला सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने मंजूर केलेल्या २२१५ कोटी रुपयांच्या निधीपैकी, ज्या शेतकऱ्यांची केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जात आहे. मात्र, खात्यावर जमा होणारी रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही मदत आहे की शेतकऱ्यांची चेष्टा आहे, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ २५००, ३०००, ३५०० ते ५०००-६००० रुपये इतकीच रक्कम जमा झाली आहे. एकीकडे सरकारने ६० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्याचे जाहीर केले असताना, प्रत्यक्षात मिळणारी मदत इतकी कमी असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एनडीआरएफच्या (NDRF) निकषांनुसार, जिरायती क्षेत्रासाठी प्रति हेक्टर ८,५०० रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत अपेक्षित असताना, मिळणारी रक्कम त्याहून खूपच कमी आहे.
मिळणारी मदत इतकी कमी आहे की, यातून रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदी करणेही शक्य नाही, अशी व्यथा शेतकरी मांडत आहेत. “ही नुकसान भरपाई आहे की भीक दिली जात आहे?” असा थेट प्रश्न शेतकरी विचारत आहेत. नुकसानीचा पंचनामा करताना नुकसानीची टक्केवारी आणि बाधित क्षेत्र कमी दाखवल्यामुळेच ही अत्यल्प मदत मिळत असल्याचा आरोपही शेतकरी करत आहेत.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
कॉर्पोरेट कर्जमाफीशी तुलना करत सरकारवर टीका
शेतकरी सरकारच्या दुजाभावावरही बोट ठेवत आहेत. “मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांची कर्ज ‘हेअरकट’च्या (Haircut) नावाखाली माफ केली जातात, मग शेतकऱ्यांच्या बाबतीतच सरकार हात आखडता का घेते?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. नुकतेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी लोणी येथील भाषणात राज्य सरकारने शेतकऱ्यांना कसा दिलासा दिला याचा पाढा वाचला होता. मात्र, प्रत्यक्षात मिळणारी मदत पाहता, हे दावे फोल ठरत असल्याची टीका होत आहे.
Ads
×
कॉल करा
₹ किंमत पहा
खरेदी करा
रब्बी पेरणीसाठीही रक्कम अपुरी, शेतकरी हवालदिल
पहिल्या टप्प्यात ३१ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना ही मदत दिली जात असली तरी, सरासरी पाहिल्यास प्रत्येक शेतकऱ्याच्या वाट्याला केवळ ५ ते ६ हजार रुपये येत आहेत. या रकमेतून खरीप हंगामात झालेले प्रचंड नुकसान भरून निघणे तर दूरच, पण रब्बी हंगामाची पेरणी कशी करायची, या चिंतेत शेतकरी सापडला आहे. त्यामुळे, सरकारने केवळ निधी जाहीर न करता, शेतकऱ्यांच्या खात्यात सन्मानजनक आणि पुरेशी रक्कम जमा करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.