Breaking News: २९ जिल्ह्यात ओला दुष्काळ नुकसान भरपाई वाटप सुरू; पण ही मदत की चेष्टा?

दुष्काळ नुकसान भरपाई: राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी पहिल्या टप्प्यातील मदत वाटप सुरू; मात्र खात्यात तुटपुंजी रक्कम जमा होत असल्याने शेतकरी संतप्त.


पहिल्या टप्प्यातील मदत वाटप सुरू

राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यातील मदत वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे, २२१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, ज्या शेतकऱ्यांची केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जात आहे. यामध्ये हिंगोली, लातूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नागपूर, अकोला, परभणी, नांदेड, धाराशिव, यवतमाळ यांसारख्या २९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

खात्यात तुटपुंजी रक्कम, मदतीवर प्रश्नचिन्ह

शासनाने मदत वाटप सुरू केले असले तरी, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणारी रक्कम पाहून त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात केवळ २५००, ३०००, ३५०० ते ५०००-६००० रुपये इतकीच तुटपुंजी रक्कम जमा झाली आहे. एकीकडे एनडीआरएफच्या निकषांनुसार जिरायती पिकांसाठी प्रति हेक्टर ८,५०० रुपये (दोन हेक्टरच्या मर्यादेत) मदत अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मिळणारी रक्कम अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण आहे.

Leave a Comment